Thursday, December 31, 2015

कविता त्यांची ऋणी...

माझ्या पहिल्या काव्यसंग्रहाला, "चांदणचुरा‘ला मंगेश पाडगावकर यांनी प्रस्तावना दिली होती. त्या वेळी त्यांच्या-माझ्या बऱ्याच भेटी झाल्या होत्या, बरंच बोलणं झालं होतं. माझ्यासाठी हा खूपच मोठा अनुभव होता. कारण, एका अशा मान्यवर कवीकडून आपल्याला कवितेच्या पुढच्या प्रवासाची दिशा मिळणं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. ते नेहमी खरेपणाने वागायचे. म्हणजे तोंडावर कौतुक केलं, असं त्यांचं नव्हतं. तुमचं चुकलं असेल तर ते अगदी कान पकडून सांगायचे. ही गोष्ट फार महत्त्वाची असते. त्या वयात अशा व्यक्तीचा सहवास मिळणं आणि आपण त्यातून काहीतरी शिकणं, ही माझ्यासाठी खूप मोठी प्रोसेस होती. त्यांचा जो सहवास त्या काळात मिळाला, तो फार मोलाचा आहे माझ्यासाठी. 

पाडगावकर प्रतिभावंत कवी होते. वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी कविता लिहिल्या होत्या. प्रेमकविता, तत्त्वज्ञान सांगणाऱ्या कविता, बालगीतं, निसर्गकविता... कवितेचा एकही ऍस्पेक्‍ट शिल्लक नाही, ज्याला त्यांनी स्पर्श केला नाही. पॉलिटिकल सटायर, हास्यकविता, व्यंगकविता असेल आणि सगळ्यावर कडी म्हणजे "श्रावणात घन निळा बरसला‘ हे त्यांचं अप्रतिम गाणं! आजतागायत पावसाची गाणी म्हटलं की, हे गाणं डोळ्यांसमोर येतं... कानांत घुमत राहतं... आणि अलगद मनातही उतरतं. खरंच, ते वेगळ्याच प्रतिभेचे कवी होते. 

कविता करणं हा प्रतिभेचा भाग आहे. खरंय; पण या कवितेला लोकाभिमुख करणंही महत्त्वाचं असतं. लोकांच्या घराघरांत नेऊन पाडगावकरांनी कविता रुजवली. वसंत बापट आणि विंदा करंदीकर यांच्यासोबत त्यांनी अक्षरश: जगभर फिरून कवितांचे कार्यक्रम तर केलेच; पण नंतर जग बदललं, तंत्रज्ञान बदललं, तशा त्यांच्या कवितावाचनाच्या अनेक सीडीज निघाल्या आणि त्या घरोघरी वाजू लागल्या. लोकांच्या तोंडी रुळल्या आणि आपसूकच "कविता म्हणजे काहीतरी कठीण...‘ असा कवितांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. कवितेशी लोक जोडले गेले. पुस्तकाच्या बाहेर जाऊन त्यांनी केलेलं हे काम कवितांसाठी खूप मोठं आहे. मराठी कविता त्यांची त्यासाठी नेहमी ऋणी राहील. 

आपण कालातीत आहोत, असा पाडगावकरांचा दृष्टिकोन नव्हता. त्यांचं आयुष्य ते सुंदर पद्धतीने आणि भरभरून जगले आहेत. त्यांची आठवण मला नेहमीच येईल; पण मला नाही वाटत की त्यांना त्यांच्यामागे कोणी अश्रू गाळलेले आवडलं असतं. आयुष्यभर त्यांनी जो हसरेपणा जोपासला, त्याची आठवण काढत राहणं आणि कवितेशी प्रामाणिक राहणं, ही त्यांना सर्वांत सुंदर श्रद्धांजली असेल. 

- स्पृहा जोशी

Friday, December 11, 2015

थोडीशी मज्जा !!

तुम्हा सर्वांकरिता थोडीशी मज्जा !!
Here is a chance to win free passes and meet Umesh Kamat & me at the premiere show of our brand new play
तुम्हाला एवढंच करायचंय...
" वरी बी परफेक्ट हँप्पी मॅच डोण्ट मिस " मध्ये दडलेल्या दोन नाटकांची अचूक नावं ओळखून १२ डिसें मध्यरात्री १२ पर्यंत 8828101085 ह्या नंबरवर तुमच्या नावासोबत SMS करायचंय.
बघूया किती फ्री पासेस जिंकताय तुम्ही..hurry up!!



Tuesday, December 8, 2015

पहिल्या पावसात भिजतानाचा धुंद करणारा अनुभव

पाऊस कधी रिमझिम, कधी मुसळधार तर कधी अचानक धुंद करणार, कधी कवेत घेणारा ओला हळवा पाऊस.
पावसाच्या अशाच काही गोड आठवणींबद्दल सांगतेय 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' आणि 'उंच माझा झोका' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री स्पृहा जोशी...
''पावसाचे थोडक्यात वर्णन करायचे म्हणजे पाऊस माझ्यासाठी ऊर्जा आणि आयुष्य. पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे. जून महिना आला, की अगदी चातकाप्रमाणे मी पावसाची वाट बघत असते. मी मुळची मुंबईची. मुंबईत चिपचिप करणारा उन्हाळा आणि फसवणारी थंडी असते. त्यामुळे मला पाऊस खूप आवडतो. बालपणापासून दरवर्षी पहिल्या पावसात भिजणं मी कधीही चुकवलेलं नाही. पहिल्या पावसात चिंब भिजतानाचा अनुभव धुंद करुन जातो. पाऊस मला प्रणयरम्य वाटतो. पाऊस गाणी, कवीतांची मी अक्षरशः वेडी आहे. त्यात मी अगदी हरवून जाते. अनेक लोकांना पाऊस म्हणजे चिखल, कटकट वाटतो, पण मला पावसाबद्दल कधीच तसं वाटलं नाही. जणू मला पाऊसवेडच आहे . 

मी पाऊस कुठेही एन्जॉय करु शकते. अगदी गच्चीत पडणारा पाऊसही मी तितकाच एन्जॉय करते. शिवाय जिथे समोर पाणी दिसतं... उदाहरणार्थ नरिमन पाँईंट, सीफेसवरसुद्धा मला पाऊस एन्जॉय करायला आवडतो.

काही दिवसांपूर्वी मी माझ्या कुटुंबीयांबरोबर सिंहगडावर गेले होते. तिथे अचानक पाऊस पडायला लागला. वर उंचावर अंगावर पडणाऱया पावसाची मजा मी लुटली. त्यामुळे पावसाची मजा लुटण्यासाठी एखादी ठराविक जागा मी निवडत नाही. बाहेर पडणारा पावसाचा अगदी खिडकीत बसूनही मी सुखद अनुभव घेत असते.

पाऊस म्हटला, की डोळ्यासमोर येतात ती गरमागरम भजी आणि कणीस. लिंबू मारके कणीस खाण्याची मजा पावसाळ्याशिवाय इतर ऋतूत येऊच शकत नाही, असं मला वाटतं. सोबत जर गरमागरम चना मसाला असेल तर मग विचारायलाच नको.

मी म्हटल्याप्रमाणे मला पाऊस गाणी ऐकायला खूप आवडतात. नॉस्टेल्जिक अनुभव देणारी आशा ताईंच्या स्वरातील, गुलजार आणि आर.डी बर्मन कॉम्बिनेशन असलेली गाणी माझी आवडती आहेत.

मी माझ्या कुटुंबीयांबरोबर पावसाची मजा लुटत असते. मात्र गेल्या पाच वर्षांपासून ही मजा लुटण्यात एक वेगळीच गंमत येतेय. त्याचे कारण म्हणजे माझा होणारा नवरा. तो माझ्या आयुष्यात आल्यापासून म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून मी त्याच्याबरोबर हा रोमँटिक ऋतू अनुभवतेय. वरद लघाटे हे त्याचे नाव. याचवर्षी आमचा साखरपुडा झाला. कामाच्या व्यापामुळे पावसात लाँग ड्राईव्हला जाण्याची वारंवार संधी मिळत नाही. मात्र जो वेळ मिळतो तो एकत्र घालवतो.

पावसात माझी फारशी फजिती झालेली नाही. हं पण... अलीकडेच पावसात शूट करता-करता मी घसरुन पडले. जिथे शूट सुरु होतं तिथे चिखल झाला होता. मी पाऊस एन्जॉय करतेय, अशाच आशयाचं ते शूट होतं. पण तोल ढासळल्यामुळे मी चिखलात पडले. त्यानंतर मात्र जपून जपून ते शूट पूर्ण केलं. खरं सांगू ते चिखलात पडणंही मी एन्जॉय केलं.

पावसाळ्यात छत्री आणि सनस्क्रिन लोशन या दोन गोष्टी माझ्यासोबत असतात. शिवाय पटकन सुकणारे कपडे परिधान करण्यावर माझा भर असतो. त्यामुळे बिनधास्त भिजता येतं. खबरदारी म्हणून खूप पाऊस पडत असल्यास मी बाहेर जाणं टाळते.

पावसात स्वतःच्या तब्येतीची काळजी म्हणून बाहेरचे अनहायजेनिक फूड खाणं टाळलं पाहिजे. खूप पाणी पिण्यावर भर असायला हवा. बाहेरचं पाणी शक्यतो पिऊ नये आणि सनस्क्रिन लोशन लावल्याशिवाय बाहेर पडू नये, असंच मी तुम्हाला सांगेन. कारण या सर्व गोष्टी मी स्वतः फॉलो करते. या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास आपण हा हळवा आणि मनाला वेड लावणारा पाऊस अडथळ्याविना अनुभवू शकतो.'' 

स्पृहा जोशी

Monday, December 7, 2015

एक 'रावण' हवाय...


बरेच राम झेललेत आपण. ‘देव’ व्हायच्या खोट्या गंडापायी माणूसपण हरवलेले... आता एक ‘रावण’ हवाय. खचल्या पिचल्या आजच्या ‘असुरां’चं साम्राज्य उभं करण्यासाठी, नवा श्वास देण्यासाठी एक खराखुरा ‘माणूस’ हवाय...
गेले काही दिवस ‘असुरा’ नावाचं खूप सुंदर पुस्तक वाचते आहे. आनंद नीलकांतन यांनी लिहिलेलं. इतिहास हा नेहमीच जेत्याच्याच नजरेतून लिहिला जातो, हे त्रिकालाबाधित सत्य तर आपल्याला माहीत आहेच. या पुस्तकातून ते ठसठशीतपणे समोर येतंच; पण जरा वेगळ्या पद्धतीने. कारण हा आहे एका पिचलेल्या जमातीचा इतिहास. त्यांच्या अत्यंत कीर्तिमान आणि खर्‍याखुर्‍या ‘माणूस’ असलेल्या ‘रावण’ नावाच्या सम्राटाचा इतिहास. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व युगांत, सर्व काळात पिचत पिचत आपलं अस्तित्व टिकून राहावं म्हणून जगण्याची लढाई लढू पाहणार्‍या सामान्यातील सामान्य माणसाचा इतिहास.
हे पुस्तक वाचताना सतत माझ्या आसपासच्या जगाशी त्या घटनांचा संबंध जोडू पाहतेय; आणि गंमत म्हणजे, त्या सगळ्या व्यक्तिरेखा माझ्यापुढे आत्ताची माणसं होऊन उभ्या राहताहेत. पण लखलखीतपणे एक गोष्ट जाणवतेय ती म्हणजे, पिढ्यान्पिढ्या लादली गेलेली, आणि कदाचित त्यामुळे सवयीची होऊन बसलेली एक भयाण मानसिकता. दगडी संकल्पना, टोकाची असहिष्णुता, स्त्रियांबद्दलची ठरीव मतं, वर्णव्यवस्था, स्वार्थाने लदबदलेल्या जातीपातीच्या उतरंडी, सत्यात जगायला घाबरायला होतं म्हणून जोंबाळलेला पलायनवादी दृष्टिकोन...
‘Dignity of Labour’ ही संकल्पना किती सहज हद्दपार केलीये आपण आपल्या सामाजिक आयुष्यातून. प्रत्येक कामाचा आपल्या पद्धतीने ठरवलेला एक दर्जा आणि ते काम करणार्‍या व्यक्तीचं पोलादी सामाजिक चौकटीतलं एक पक्कं स्थान. का? कदाचित फार स्वस्त मिळतंय आपल्याला हे सगळं म्हणून? पैसे फेकून हवं ते मिळवता येतं हा माज आहे, म्हणून? का मग ही असली कामं असल्याच लोकांनी करायची असतात, ही तीच युगानुयुगांची पक्की समजूत, म्हणून? या सगळ्यांना स्वत:चं स्थान निर्माण करायला शिडी मिळूच नाही द्यायची? एखाद्याने ते सिद्ध केलंच, तर त्याची हेटाळणी करत राहायची? आणि त्यात जर ती स्त्री असेल, तर मग प्रश्नच मिटला.
मला हे सगळं प्रकर्षाने जाणवतंय, ते गेल्या काही दिवसांतल्या चर्चा ऐकून. उबग आल्यासारखं वाटतंय. निवडणुका झाल्या. प्रचार झाले. पूर्वीच्या सत्ताधारी आणि आता विरोधी (आणि उलटसुद्धा) पक्षांनी एकमेकांवर वैयक्तिक नारेबाजी, कुरघोड्या, प्रसंगी चिखलफेक असं एकही शस्त्र वापरायचं सोडलं नाही. fair enough.. लोकशाहीच्या खेळाची अशीही एक पद्धत! पण काही मुद्द्यांची मला वैयक्तिक शिसारी वाटली. आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री असलेल्या स्मृती इराणी, या कोणे एके काळी MacDonald's मध्ये बर्गर सर्व्ह करायच्या. ‘ही अशी बाई कॅबिनेटमध्ये इतक्या महत्त्वाच्या जागेवर असूच कशी शकते?’ अशी हाकाटी विरोधकांकडून मारण्यात आली. म्हणजे? हा कुठला मुद्दा? एक सामान्य मुलगी आपल्या स्वत:च्या हिमतीवर जगण्याचं भान उंचावते, जीवतोड कष्ट करून, तिच्या पिढीची सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही नायिका बनते, निवडणुकीत राहुल गांधींविरोधात जिंकण्याचा अपार प्रयत्न करते, ही गोष्ट जास्त वंडरफुल नाही? याने आपला ऊर भरून येत नाही? कोणे एके काळी सोनिया गांधी जेव्हा राजकारणात प्रवेश करत होत्या, तेव्हा ‘एक वेट्रेस काय देश चालवणार’ अशी हेटाळणी त्यांच्या विरोधकांनीही केली होतीच की! खुद्द पंतप्रधान मोदींनासुद्धा ‘मी लहानपणी ‘चहावाला’ होतो. आणि गरीब मागास जातीचा मुलगा आज पंतप्रधान व्हायचं स्वप्न पाहू शकतो,’ हे ‘सांगावं’ लागलं.
कोणी कोणावर सत्ता गाजवायची, ते जन्मसिद्ध हक्कानेच सिद्ध होतं; ते कष्टसाध्य असूच शकत नाही, या सरंजामशाही, बुरसट मनोवृत्तीतून कधी बाहेर पडणार आपण? हा कोतेपणा, भित्रेपणा दिवसेंदिवस इतका सवयीचा होत जातोय की, षंढत्व भिनत जातं अंगात. मग एखादी बाई कळवळून म्हणते, बदमाशांची नाही, बघत राहणार्‍या षंढांची भीती वाटते.. पण तेवढ्यापुरते दचकून आपण पुन्हा निघून जातो आपल्या सुखी कोषांत...कारण बाईच्या मताला किंमत द्यायची सवयच नाहीये आपल्याला, आपल्या समाजाला. पिढ्यान्पिढ्या, युगानुयुगे!! म्हणूनच आनंद नीलकांतन यांचं ‘रावणायन’ (असुरा) मला खूप आपलंसं वाटतंय. बरेच राम झेललेत आपण. ‘देव’ व्हायच्या खोट्या गंडापायी माणूसपण हरवलेले... आता एक ‘रावण’ हवाय. खचल्या पिचल्या आजच्या ‘असुरां’चं साम्राज्य उभं करण्यासाठी, नवा श्वास देण्यासाठी एक खराखुरा ‘माणूस’ हवाय...

स्पृहा जोशी

Sunday, December 6, 2015

डोंगराएवढ्या माणसांची शिदोरी !

गेले काही दिवस फार विचित्र अनुभव येतायत मला.. प्रसंग पहिला : करिअरची नवी नवी सुरुवात. कोणीच ओळखी-पाळखीचे लोक आसपास नाहीत. टक्के टोणपे खात स्वत:ला सिद्ध करायची धडपड चाललेली... नव्या क्षेत्रात उतरण्याची भीती, आणि स्ट्रगलचा चकवा.. आसपास काही मातब्बर लोक. असे अनुभवी मातब्बर लोक.. नवीन माणसाला या चकव्यातून बाहेर पडायला मदत न करणारे. एका सुप्रसिद्ध दिग्दर्शकाने मला सांगितलं होतं, ‘तू ना हिरोईनसारखं वागत नाहीस. तिच्याकडे एक attitudeपाहिजे.. तू टिकणार नाहीस फार. सेटवरच्या सगळ्या माणसांशी हे असं नसतं वागायचं हीरोइनने...’ मी दडपून गेले. ‘हे असं म्हणजे??’ माज करत फिरली, सतत नखरे केले, म्हणजे हीरोइन चांगली? बाकी मी काम कसं करते, किती प्रामाणिक आहे, भूमिका समजून घेते का नाही, याला काही महत्त्व नाही?? मी जपून जपून त्याला हे विचारत राहिले. त्यावर तो म्हणाला, ‘अगं किंमत नाही ठेवत मग कोणी...’ कमाल आहे बुवा! ‘यूही हम दिल को साफ रखा करते थे, पता नही था की किमत चेहरे की होती है!’ (हे तेव्हा नव्हतं सुचलं वाक्य, आता मागाहून आलेलं शहाणपण आहे) गंमत राहू दे, पण इंडस्ट्रीने मला दिलेला हा पहिला कानमंत्र होता.
माझ्या पक्का लक्षात राहिलेला, पण मी कधीही न पाळलेला...
प्रसंग दुसरा- एका कुठल्या तरी वेबसाइटने माझं नाव वापरून भलतीच गोष्ट अपलोड केली होती. एका मित्राच्या ते लक्षात आल्यावर नाना खटपटी करून त्याने ते प्रकरण नीट सांभाळलं. पण मनस्ताप व्हायचा तो झालाच. त्यावर तो म्हणे, ‘तू याच्याकडे उत्तम साईन म्हणून बघ गं, दुसर्‍या देशातल्या कोणा वेबसाइटला तुझं नाव वापरलं की त्यांच्या हिट्स वाढतील असं वाटत असेल, तर तुझी popularityबघ न कितीये...’ त्याच्या माझ्यावरच्या प्रेमाचा भाग सोडून देऊ, पण मी मात्र हलले या गोष्टीमुळे. एकीकडे वाटत होतं, आपल्याला बरं का वाटत नाहीये या प्रतिक्रियेमुळे? आपली ओळख नेमकी काय?

प्रसंग तिसरा - माझ्या कामाचं माझ्या तोंडावर प्रचंड कौतुक करणारे एक दिग्दर्शक खासगीत एका पार्टीत म्हणाले, ‘ही हीरोइन मटेरियल नाय रे. फिल्म्समध्ये नाही चालणार ही मुलगी. तिच्यात ‘ते’ नाही!’ आधी खूप वाईट वाटलं मला; पण हळूहळू शांतपणे थांबून पाहायला लागले. ही किमया आमच्या ‘तिसरी गोष्ट’च्या पटकथाकार संदेश कुलकर्णीची. संदेशदादाने आमच्या मालिकेत एकदा एक फार सुंदर संवाद लिहिला होता... मोठे बाबा ईशाला सांगतात, ‘मला जेव्हा एखादी गोष्ट कळत नाही न, तेव्हा उत्तर शोधायची मी घाई नाही करत; मी वेळ घेतो, त्या गोष्टीपाशी थांबतो, आणि मग ती गोष्ट आपोआप उमलत जाते...’ मीही थांबले, हळूहळू शांतपणे पाहायला लागले, तशी नव्याच गोष्टी उलगडत गेल्या समोर.

पहिला प्रश्न मी स्वत:ला विचारला की, ‘चांगली अभिनेत्री’, की ‘लोकप्रिय नटी’ नेमकं काय बनावंसं वाटतंय आपल्याला? प्रसिद्धी, पैसा, यश हे सगळं तर हवंच आहे. मग हा dilema का येतो? माझी आई नेहमी म्हणायची, अजूनही सांगते; लोकप्रियता हाताळणं हे फार कष्टाचं काम आहे. येरागबाळ्याला नाही जमत ते... पावलापावलावर तिचं हे सांगणं किती यथार्थ आहे हे जाणवत राहतं.

असे खूप मित्रमैत्रिणी पाहिलेत मी आमच्या क्षेत्रात, हे लोकप्रियतेचं भूत न पेलवणारे. वेगळंच वागणारे.. आपल्याला तसं व्हायचं नाही. पडद्यामागे अभिनय करता करता ‘कट’ म्हटल्यानंतरही अभिनय करत राहणारे. अशा खोट्या मांदियाळीत आपल्याला जायचं नाही. नाही व्हायचं आपल्याला मोठ्ठी हीरोइन. बरं माणूस होता आलं तरी पुरे. हळूहळू जसं काम करत गेले, तसं एक एक डोंगराएवढी माणसं भेटत गेली. पडद्यामागची कामं करणारे कामगार, तंत्रज्ञ यांच्यासाठी जीव टाकणारी कित्येक मंडळी. त्यांचं भलं व्हावं म्हणून तीळतीळ तुटणारी... कोणी सगळ्यांचा विमा काढून द्यायचं काम अंगावर घेतलेलं, तर कोणी त्यांना सुग्रास जेवण मिळावं म्हणून धडपडणारं. कोणी त्यांच्या कामाचे तास कसे आटोक्यात राहतील यासाठी आकाशपाताळ एक करणारं, तर कोणी नुकत्या हातात आलेल्या तुटपुंज्या नाइटचं अख्खं पाकीट लाइटमनच्या हातात सुपूर्द करणारं...

या माणसांना भेटल्यावर आसपासच्या लोकांकडे बघण्याची पद्धतच बदलली. माणसाकडे माणूस म्हणूनच बघायला पाहिजे, हे कळलं. मनापासून हसल्यामुळे काय कमी होतं आपलं? एखाद्याशी प्रेमाने बोललो, तर कितीशी पत कमी होते? हे एकदा लक्षात आल्यानंतर मग हे आपली इंडस्ट्रीत किंमत किती,’ असले फिजूल प्रश्न पडेनासेच झाले... खूप नवे नवे मित्र मिळाले. स्पॉटबॉईज, हेअरड्रेसर्स, मेकअपमेन, लाइट दादा किती तरी मित्रमैत्रिणी. आपली माणसं झाली, एका हाकेला धावून येतील अशी. नवी कामं मिळतील, तितका विश्वास आहे माझा माझ्यावर. पण ही माणसांची जंगी फौज या कशाहीपेक्षा फार म्हणजे फारच मोलाची आहे. विचित्र अनुभवांची ही किंमत मोजून जे संचित मिळालंय, ते मात्र खरोखरच अनमोल असंच आहे. प्रवास चालूच आहे. वाट धुंडाळणं चालूच आहे. तहानलाडू भूकलाडू म्हणून ही अशी शिदोरी आहे सोबत.. मनात एकच धरून चाललेय,
कुण्या गावातली ती वाट होती पोरकी,
तिला ठाऊक नव्हती चाल दुसरी बेरकी;
दिगंताचे तिला अदमास नव्हते नेमके,
हसायचे कशासाठी तिने मग नाटकी..!!

- स्पृहा जोशी

Saturday, December 5, 2015

एक अनामिक ओझं

मुक्तछंद - प्रत्येक प्रवासाची सुरुवात पाठीवर एक ओझ्याचं गाठोडं घेऊन होते. एक नवा शोध, नवी माणसं, नवी नाती. गुंत्यात न गुंतता निर्लेप राहून शेवट गोड करण्याची अटळ धडपड. पण हे न गुंतणं साधत मात्र नाही. 

प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतोच. आपल्याला आवडो किंवा न आवडो. सुरू होताच तिचा अंतही ठरलेला असतो. पण हे लक्षात घ्यायला इतका वेळ का लागतो मला?

प्रत्येक प्रवासाची सुरुवात पाठीवर एक ओझ्याचं गाठोडं घेऊन होते. एक नवा शोध, नवी माणसं, नवी नाती. गुंत्यात न गुंतता निर्लेप राहून शेवट गोड करण्याची अटळ धडपड. पण हे न गुंतणं साधत मात्र नाही. प्रत्येक वेळी तीच ओढाताण, आणि शेवट जवळ यायला लागल्यावर पाठीवर जास्तीत जास्त जाणवायला लागणारं कसलं तरी अनामिक ओझं.

मीच अवघड करून घेते, माझ्या प्रवासाचा रस्ता. खाचखळगे, काट्याकुट्यांचा रस्ता ओढवून घेते, स्वत:वर बहुतेक. कारण माझ्या बरोबरच्या सहप्रवाशांना इतका त्रास होतोय, असं जाणवत का नाही मग! त्यांच्यासाठी का सोपं असतं, हे ‘न गुंतणं’?? कसं जमतं त्यांना असं कमळावरचा थेंब होण्याइतकं मोकळं राहणं? मला शिकायचंय हे असं, पाण्यात राहूनही न भिजत पोहणं. मलाही हवाय हा सहजपणा. खूप अंतरावर असल्यासारखं वाटतं, लोकांच्या अगदी जवळ असूनसुद्धा. पुसून टाकायचंय ते अवघडलेपण. एक संशोधक म्हणायचा म्हणे, ‘आपल्या प्रत्येकात एक आदिम माकड दडलेलं असतं.’ माझ्या आतलं माकड हल्ली मला जास्त जास्त जाणवायला लागलंय. माझ्या अशा दुहेरी वागण्याला कंटाळून थकून गेलं असावं बहुतेक. त्याचं आतल्या आत वाढत चाललेलं वजन जाणवतं मला अलीकडे रोज. ते मला झेपत नाहीये, हे जाणवत असावं बहुधा, त्यालाही! माझा शून्य वेग त्याच्या उतावीळ धडपडीला पाहवत नाही. आसपासच्या कशानेच माझं रक्त उसळत नाही, म्हणून ते उसळत असतं आतल्या आत. इतक्या जोरात की, हृदयाची धडधड वाढते आणि आतलं माकड या क्षणी बाहेर पडेल की काय, अशीही भीती वाटायला लागते मला, बर्‍याचदा... मी त्याला थोपवून धरते, माझ्या पूर्ण शक्तीनिशी. मग ते आणखी चिडतं, चेकाळतं. आतल्या आत गुरगुरायला लागतं. ते गुरगुरणं वाढतं, वाढतंच जातं, माझ्या खांद्यावरचं प्रवासाचं ओझं वाढतं, वाढतंच जातं... प्रवासात गवसलेला आनंद मागे पडत जातो प्रत्येक पावलागणिक, आणि हे दु:ख सामोरं येत राहतं उरलेल्या वाटेला लगडून.

पण अशीही एक वेळ येईल कदाचित, सगळं इतकं ‘खरं’ होईल, ही वरवरची ‘मी’ पार भेदून आतलं माकड वर येईल. अस्तित्वाचे हे असले भुक्कड प्रश्न त्याला पडणार नाहीत. नुसत्याच फिजूल विचारांनी त्याच्या कपाळावर आठ्यांची जाळी पडणार नाहीत. ते जगत राहील निरुपयोगी विचार न करता, त्याला हवं तसं. मोकळा श्वास घेईल त्याला हवा तेव्हा. डोळ्यातल्या काजव्यांची चमक हरवू देणार नाही, हृदयातल्या निखार्‍यांची धग विझू देणार नाही. नुसतंच ‘जगाला’ लायक न होता ते ‘जगायला’ लायक होईल... कदाचित...

...आज या गोष्टीच्या शेवटाकडे पुन्हा एकदा मी एकटी उभी आहे. माझ्या माझ्या विचारांच्या वाळवंटात... माझे सगळे सहप्रवासी प्रवासाच्या सुखद आठवणी सांगतायत, एकमेकांना आनंदाने. आणि मी हातात घट्ट धरून ठेवू पाहते आहे, त्याच प्रवासाची निसटणारी वाळू. मृगजळ शोधत माझा हा समांतर प्रवास असाच चालू राहणार बहुधा, कायमचा... कारण प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतो, असायला हवा, हे मान्यच करत नाही माझ्यातलं वेडं माकड...!!!

- स्पृहा जोशी

लोपामुद्रा घडताना...


‘लोपामुद्रा’चा अर्थ समजावताना मला अरुणाताई मागे म्हणाल्या होत्या, ‘‘समोरच्याच्या अस्तित्वात जिची मुद्रा लोप पावली आहे, अशी स्त्री. या संकल्पनेने त्या दिवशी खर्‍या अर्थाने माझ्या मनात आकार घेतला. आणि मग अशा कित्येक ‘लोपामुद्रा’ घरी-दारी, शेजारी-पाजारी नव्याने दिसायला लागल्या.

पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. स्थळ : कविवर्य मंगेश पाडगावकरांचा दिवाणखाना. प्रचंड दडपणाखाली धडधडत्या हृदयाने हातात ‘चांदणचुरा’ची रफ कॉपी घेऊन बसलेली मी... माझं टेन्शन थोडं थोडं आईच्याही चेहर्‍यावर उतरू लागलेलं. माझ्या हातात भाऊ मराठ्यांनी दिलेली चिठ्ठी- ‘‘या मुलीच्या काव्यसंग्रहाला आपण शुभाशीर्वादपर काही लिहून द्यावे, ही विनंती.’’ त्या चिठ्ठीला घामेजलेल्या हातात सतरा वेळा खेळवून चुरगळून पुन्हा उघडून पाहून झालेलं. इतक्यात दस्तुरखुद्द मंगेश पाडगावकर हळूहळू पावलं टाकत आले, चक्क समोर बसून म्हणाले, ‘‘बोला... मी काय करू तुमच्यासाठी???’’ मी blank... संपूर्ण पाटी कोरी. देवळात गेल्यावर अचानक मूर्तीच तुमच्याशी बोलायला लागली तर??? जवळपास तशीच अवस्था. ततपप!!! माझ्याकडून जुजबी माहिती कळल्यावर पाडगावकरांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. ‘‘कविता करते म्हणत्येस, पण वाचतेस का? आवडता कवी कोण? त्याची एखादी कविता म्हणून दाखव. छंद, वृत्तांचा अभ्यास केलायस?’’ बाऽऽऽऽप रे!! मला काही सुधरेच ना. मला म्हणाले, ‘‘मी वाचतो तुझं हे बाड, पण कविता आवडल्या नाहीत तर मी खोटं लिहिणार नाही हां...’’ जाड चष्म्याच्या आतून त्यांचे प्रेमळ मिश्कील डोळे मला लुकलुकताना दिसले. अचानक हुश्श वाटलं.

आठ दिवसांनी जेव्हा पुन्हा त्यांच्याकडे गेले, तेव्हा मनोगत लिहून तयार होतं. ‘‘छान लिहितेस तू; पण वाच, आणखी खूप वाच. शब्दांशी खेळायला शिक. त्यांच्याशी झटापट करू नकोस, ते आपणहून येऊ देत तुझ्यापाशी. लिहीत जा रोज नेमाने. सवय लावून घे लिहिण्याची. कुसुमाग्रज वाच, बोरकर वाच, इंदिराबाई वाच, खूप वाच. आणि बघ, जमल्यास हा पाडगावकर पण वाच...’’ पुन्हा एकदा हसर्‍या मिश्कील डोळ्यांची लुकलुक... या वेळेस मात्र मला भीती नाही वाटली. मीसुद्धा खदखदून हसले. जवळपास नाचत नाचत घरी आले होते, ते ‘शुभाशीर्वाद’ घेऊन. त्यांचा प्रत्येक शब्द, प्रत्येक भाव मी खरंच कानात प्राण आणून ऐकला होता. ‘चांदणचुरा’चा भाग्ययोग म्हणायचा की, यांच्या शब्दांचं त्या पुस्तकाला कोंदण मिळालं. कवी प्रवीण दवणे यांनी प्रस्तावना लिहिली, ‘धुक्यातून कोवळे किरण यावेत तशी कविता...’ किती सुंदर वाट दाखवली दवणे सरांनी पुढच्या प्रवासासाठी. किती सहज. किती सोपी... आमचे निसर्गकवी नलेशदादा पाटील स्वत: प्रकाशनाला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. आणि कवितेची उत्तम जाण असलेले ज्येष्ठ नाटककार, माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष सुरेश खरे... माझे खरे आजोबा... जातीने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहिले, माझ्या कवितांचं रसग्रहण करायला... ‘अक्षरग्रंथ’च्या डॉ. रामदास गुजराथी सरांनी किती कौतुकाने केलं हे पुस्तक. सगळ्यात कहर म्हणजे माझे अत्यंत आवडते, ज्येष्ठ कवी शंकर वैद्य यांनी कौतुकाचं पत्र पाठवलं होतं, ‘चांदणचुरा’ वाचून. हर्षवायू... वेळ खरंच किती भराभर निघून जातो... पाच वर्षं झालीसुद्धा...

आत्ता हातात ‘लोपामुद्रा’ची प्रुफं घेऊन बसले आहे. आणि या सगळ्या आठवणींनी कोंडाळं केलंय. झरझर किती गोष्टी गेल्या नजरेसमोरून. आता माझा दुसरा काव्यसंग्रह तयार होताना बघतेय. खूप म्हणजे, खूप मजा वाटतीये मला. पुन्हा तीच हुरहुर, पुन्हा तीच उत्सुकता, पुन्हा तशीच धडधड. कुठून सुरू झालं बरं? ‘चांदणचुरा’नंतर कविता करत होतेच जेव्हा जमतील तशा. ‘उंच माझा झोका’च्या सेटवर अचानक एक दिवस आमच्या प्रा. नितीन आरेकरांसोबत ‘तारांगण प्रकाशना’चे मंदार जोशी आले होते. गप्पा मारता मारता अचानक ते म्हणाले, ‘‘आपण करूया की तुझं पुस्तक...’’ मी चकित. माझ्या ढिम्म स्वभावाप्रमाणे मी आधी निवांतच घेतलं ते बोलणं; पण मंदार सरांनी मात्र त्यांचा शब्द खरा करून दाखवला. अगदी माझ्या सगळ्या कविता गोळा करून, त्यांना हा आजचा आकार येईपर्यंत. कित्येक वर्षांपूर्वी सुमित पाटील नावाचा माझा गुणी चित्रकार मित्र मला म्हणाला होता की, तुझ्या पुस्तकाचं डिझायनिंग मी करणार. आज ‘लोपामुद्रा’ त्याच्या अर्थवाही चित्रांनी सजून नटून माझ्या हातात आहे.

आज या सगळ्याकडे जरा बाजूला होऊन पाहताना मला जाणवतंय की, आपलं एक पुस्तक येतंय, हा आनंद तर आहेच; पण या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, हा प्रवास करत असताना जे संचित गाठीशी आलंय, ते केवळ अवर्णनीय असं आहे.

माझी एक हक्काची मोठ्ठी मैत्रीण आहे. तिला मी कधीही उठून माझ्या मनातली शंका विचारू शकते, तिचं नाव कवयित्री अरुणा ढेरे. ‘लोपामुद्रा’चा अर्थ समजावताना मला अरुणाताई मागे म्हणाल्या होत्या, ‘‘समोरच्याच्या अस्तित्वात जिची मुद्रा लोप पावली आहे, अशी स्त्री. प्रत्येक भारतीय स्त्री ही त्या अर्थाने खरं तर लोपामुद्राच आहे. with choice or without choice...’ या संकल्पनेने त्या दिवशी खर्‍या अर्थाने माझ्या मनात आकार घेतला. आणि मग अशा कित्येक ‘लोपामुद्रा’ घरी-दारी, शेजारी-पाजारी नव्याने दिसायला लागल्या. त्यांचं भावविश्व खुणावायला लागलं. साखरजाग, जाग, माध्यान्ह आणि निरामय असे त्यांच्या आयुष्यातले वेगवेगळे टप्पे ‘माझे’ होऊन आपलेसे वाटायला लागले. ‘लोपामुद्रा’ घडू लागली होती... आणि आज तिचं देखणं, साजरं मूर्त रूप माझ्या हातात आलंय. माझ्या आत काही तरी लकाकतंय. मला खरंच भरून येतंय. या प्रवासाने माझ्या आतल्या लोपामुद्रेला सुखावलंय. नवं पाऊल टाकायला मला नवं बळ दिलंय...

- स्पृहा जोशी 

Saturday, November 7, 2015

Happy Diwali !!




किचनची सुपरस्टार मध्ये दिवाळी स्पेशल celebrity guests बरोबर !!
Mon to Fri 1 PM on star pravah

Happy Diwali to all !!



Saturday, October 24, 2015

जगण्‍याला'ला पडलेले प्रश्‍न

स्वत:च्या मनाचं ऐकून तसंच प्रत्यक्ष वागण्याची हिंमत फार कमी जणांकडे असते. या दोघीही त्याचं मूर्तिमंत प्रतीक. अभिनयाच्या बाबतीत तर काय बोलावं. नैसर्गिक अभिनयाच्या चालत्याबोलत्या पाठशाळाच जणू. चश्मेबद्दूर, कथा, अनकही, मेमरीज इन मार्च मधली दीप्ती आणि अर्थ, भूमिका, मंडी, मंथन यांतली स्मिता कशी आणि कोण विसरू शकेल? अर्थात त्यांची अभिनयशैली, चित्रपट क्षेत्रातलं त्यांचं योगदान या सगळ्याबद्दल मी चर्चा करत नाहीचे आत्ता. कारण मी त्यांच्याबद्दल काहीही बोलणं म्हणजे बेसिक काजव्यानं तळपत्या सूर्याकडे झेपत नसताना डोळे फाडफाड उघडे ठेवून बघत राहण्याचा अट्टहास करण्यासारखंच आहे. पण या दोघींचा माझ्यावर प्रचंड प्रभाव आहे, हेही तितकंच खरं. आज हे सांगण्याचं कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी एक ‘न पाठवलेलं पत्र’ माझ्या वाचनात आलं. मुळात ‘पत्र’ या विषयाबद्दल मला खूप ओढ आहे. त्यामुळे खेचली गेले मी त्याच्याकडे. पत्र नव्हतं ते साधंसुधं. कविताच होती मुक्त. ओठंगून आलेल्या भावना होत्या. पूर्वी कधी काळी सांगायचं राहून गेलेलं, व्यक्त-अव्यक्तसं बरंच काही होतं त्या काही ओळींमधून ओसंडणारं. मनात घर करून गेला त्यातला पारदर्शी नितळपणा. ते पत्र होतं दीप्तीने आपल्या मैत्रिणीला, स्मिताला लिहिलेलं.. ती गेल्यावर... त्या हृदयस्पर्शी कवितेचा भावानुवाद आपल्याशी शेअर करते आहे. कारण बघायला गेलं तर हे आपल्या प्रत्येकाचं म्हणणं आहे. त्यांच्या चंदेरी दुनियेतून, त्या झगमगाटातून ही कविता आपल्या जगण्याशी जोडून पाहा, तुम्हाला जाणवेल की हे आपलेही प्रश्न आहेत.

सतत धावताना 
आपापल्या स्वप्नांपाठी 
आपण भेटायचो प्रत्येक वेळी- 
बॅगेज क्लेम्स 
व्ही. आय. पी लाउंजेस 
चेक- इन काउंटर्स.. 

एखादा क्षण एकत्र उभे राहायचो 
‘आ’ वासून पाहणार्‍या 
लोकांच्या घोळक्यामध्ये, 
बोलल्या - न बोलल्या 
गेलेल्या शब्दांमध्ये! 
तळमळत होतो, 
काही सांगण्यासाठी (एकमेकींना.) 
पण घाबरलो होतो, 
घाबरलो होतो, स्वत:लाच!! 

आपल्या सभोवताली लोक ओरडत होते, 
नजरेने फाडून खात होते, 
आणि हा सगळा वेडेपणा 
आपण नुसत्या पाहत होतो, 
‘आपलेच’ चश्मे घालून. 

‘तो’ एकच खराखुरा क्षण 
जगण्याचा प्रयत्न करत होतो, 
एकच नजर, एकच स्पर्श, 
एकत्र असावंसं वाटणं. 
. आणि पुढे जात होतो. 

आपण शेवटचे भेटलो, 
विमानाची वाट बघत, 
मला आठवतंय मी म्हणाले होते, 
‘‘हे आयुष्य जगण्याचा 
यापेक्षा वेगळा काहीतरी 
मार्ग असेल, असेलच न??’’ 

खूप वेळ तू शांत राहिलीस, 
आणि मग, पापणीही न हलवता 
माझ्याकडे वळूनही न बघता म्हणालीस, 
‘‘नाही. कधीच नसतो.!!’’ 

आज 
तू निघून गेलीयेस, 
आणि मी मात्र अजूनही 
धावतेच आहे; 
तू चुकीची होतीस 
हे सिद्ध करण्याचा वेडा प्रयत्न 
मी अजूनही करतेच आहे.! 
- दीप्ती

Wednesday, October 21, 2015

मैं जिंदगी का साथ निभाता चला गया

स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवून हसत हसत वास्तव स्वीकारणारे मला जास्त ‘हीरॉइक’ वाटतात. वर्तमानाशी झगडत भविष्यकाळ सुंदर करू पाहणाऱ्या या ‘रिअल लाइफ हीरोज’चं म्हणूनच मला खूप खूप जास्त कौतुक वाटतं...


गोष्ट आहे तशी साधीच. आपल्या रोजच्या माहितीतली. गोष्टीचा नायक, अगदी आपल्यातला कोणीही. सकाळी उठून लोकल पकडून ऑफिस गाठणारा. कॉर्पोरेट कंपन्यांचं कोरडं कल्चर वागवत फिरणारा. संध्याकाळी गर्लफ्रेंडला किंवा बायकोला भेटण्यासाठी जिवाचा आटापिटा करणारा. त्याच्या दिवसाची सुरुवात होते, संध्याकाळी ‘तिला’ कुठे भेटायचं, ‘तिला काय काय सांगायचं’, ह्याचं प्लॅनिंग करण्यापासून आणि हा रात्री झोपतो, पुन्हा ‘अरे देवा, उद्या परत ऑफिस!!!’ असं म्हणत म्हणत. शनिवार-रविवारचं याचं शेड्युल पक्कं असतं. जवळच्या मित्र- मैत्रिणींसोबत मज्जा.. खरं तर ऐश करायची. चंगळ करायची. सगळं फ्रस्ट्रेशन तेवढ्यापुरतं भिरकावून द्यायचं आणि मग पुन्हा.. “ मै जिंदगी का साथ निभाता चला गया; हर फिक्र को धुए में उडाता चला गया...”
वरवर पाहता बऱ्याच जणांना वाटेल की हे तर काय, आपलंच आहे की! कित्येक आईबाबांना वाटेल, की यात कौतुक करण्यासारखं काय आहे? हातात पैसा येतो या मुलांच्या पटकन, उडवायला हे मोकळे! अतिशय बेजबाबदार पिढी, चंगळवादी वृत्ती, बेदरकारपणा अंगात मुरलेला, काही सिरियसली घ्यायला नको... आमच्या वेळी...!!!!! त्यांच्या जागी त्यांची तक्रार योग्यच असते म्हणा. पण मला मात्र थोडं वेगळं काही सांगायचंय. एक वेगळीच बाजू या मित्रांकडे पाहिल्यावर जाणवली. ती मांडायचीय.
यांच्यापैकी कित्येक जण हे आत्ता जे काम करतायत, जो जॉब करतायत, तो त्यांना मनापासून पसंत नाहीये. कदाचित यांचे छंद वेगळे होते, स्वप्नं वेगळी होती. त्यांना आयुष्यात वेगळंच काही करून दाखवायचं होतं. बनून दाखवायचं होतं. पण... असं घडलं मात्र काहीच नाही. प्रत्येक वेळेस आपल्याला हवं तेच, आणि हवं तसंच घडतं, असं नाही. प्रत्येक वेळेला आयुष्य एक नवं आव्हान देत असतं आपल्याला पार करण्यासाठी. नाही पूर्ण होत प्रत्येकाची स्वप्नं. नाही प्रत्येकाला मिळत आपल्या मनासारखे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य... यातले अर्धे लोक आज इंजिनिअरिंग करून, मग एम.बी.ए.ची डिग्री घेऊन एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत सरधोपट चाकोरीचा जॉब करतायत. त्यांना ते फार आवडतंय, अशातला भाग नाहीये. पण त्यांनी हे स्वीकारलंय. काही पर्याय नाही म्हणून स्वीकारलंय. स्पर्धेच्या युगात टिकून राहायलाच हवं, म्हणून स्वीकारलंय. टोकेरी पिअर प्रेशरमुळे स्वीकारलंय...
त्यांच्यापैकी काही जणांच्या आईबाबांना असंही वाटतं की, आपली मुलं ‘लाइनवर’ आलीयेत. “छंदबिंद ठीक आहेत आपापल्या जागी, पण त्याने काही पोट भरत नाही. चार जणांच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायची म्हणजे नोकरीचा विचार आधी. मग पगार, गाडी, घर, लग्न, मुलीकडच्यांच्या अपेक्षा...” आलेच आहेत ते लाइनवर. आपापल्या स्वप्नांना, इच्छांना तिलांजली देऊन. आपलं आयुष्य एका वेगळ्याच साच्यात मापून. पार पाडतायत रोजचा दिवस आपल्या घरच्यांना खुश पाहण्यासाठी. झगडतायत रोजच्या रोज स्पर्धेत टिकून राहण्यासाठी. आणि झगडतायत स्वतःच स्वतःशीच...
आपण अनेक चित्रपटांमध्ये बघतो, हीरो शेवटी ‘अपने दिल की सुनो’ म्हणत आपल्या स्वप्नांना गवसणी घालतो. ‘वेक अप सिड’ पाहिला असेल सगळ्यांनी. त्यातला नायक ‘वाया गेलेल्यात’ जमा असतो. नायिका त्याला त्याची पॅशन शोधायला मदत करते. आणि तो त्याच्या छंदामध्येच त्याचा जॉब शोधतो. त्याला त्याचा मार्ग सापडतो. ‘अपने दिल की सुनो...’
मी स्वतः मला मनापासून जे काम आवडतं, ते करते आहे. त्यात कितीही दमले तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा शूटिंगसाठी निघण्याचा उत्साह माझ्यात असतो. माझी पॅशन हाच सुदैवाने माझा व्यवसाय आहे. आणि जर मला हे करता आलं नसतं, तर ते वास्तव मी तरी समजूतदारपणे स्वीकारू शकले असते, असं मला नाही वाटत. खरंच! कोणतीही तक्रार न करता एकाच पद्धतीचं, सरधोपट सर्वसामान्य आयुष्य जगत राहणं खूप कठीण आहे. म्हणून यातला प्रत्येक जण मग स्वतःच स्वतःचं मोटिव्हेशन शोधतो. कोणी महागड्या फोनमध्ये, कोणी शनिवार- रविवार बाहेर जेवायला जाण्यामध्ये. कोणी मॉलमध्ये जाऊन नव्या कपड्यांची खरेदी करण्यामध्ये, तर कोणी ई.एम.आय.वर गाडी घेऊन आपल्या आवडीची गाणी ऐकत लाँग ड्राइव्हवर जाण्यामध्ये. वरवर या चैनीच्या गोष्टी वाटतील कदाचित, पण त्यामागची कारणं मात्र वरवरची किंवा बेजबाबदार नक्कीच नाहीयेत.
चित्रपटाचा शेवट गोड होतो. ‘लाइनवर’ आलेल्या हिरोला त्याच्या आयुष्याचं साध्यही मिळतं आणि त्याची हीरॉइनही मिळते. पण प्रत्यक्ष आयुष्यात सगळं इतकं सहजसोपं नसतं. म्हणून स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवून हसत हसत वास्तव स्वीकारणारे माझे हे सगळे मित्र मला जास्त ‘हीरॉइक’ वाटतात. वर्तमानाशी झगडत भविष्यकाळ सुंदर करू पाहणाऱ्या या ‘रिअल लाइफ हीरोज’चं म्हणूनच मला खूप खूप जास्त कौतुक वाटतं..!!!

स्पृहा जोशी

Sunday, October 18, 2015

काश्‍मीरचे हास्य परतावे


काही न सुचायचाही एखादा दिवस असतो. जिथे काहीच तुमच्या मनासारखं घडत नाही. आसपास घडणारं काहीच तुम्हाला आवडत नाही. हवा लहरी वाटत राहते. दिवस आडवातिडवा कूस बदलत राहतो. श्वास आतल्या आत कोंडत राहतो. मळभ दाटून आलेलं असतं बाहेर...आणि आतही. मनाला खूप विचारांची वावटळ जितकी त्रास देते, त्यापेक्षा जास्त ही ‘काहीही विचारच नाही सोबतीला’ अशी अवस्था छळत राहते. काही फार दुःखद चालू असतं आसपास असं नव्हे; पण प्रसन्नपणाचा शिडकावाही नसतो. कशामुळे होतं असं, कोण जाणे? पण अनेकदा होतं. चढत जाणा-या उन्हासोबत थरकापत जातो जीव, तेव्हा नक्की कोणाचं आणि कशाचं भय वाटत असतं? आपल्या घरात, सावलीखाली बसलेलो असतानाही भिरभिर वावटळ आपल्याला गिळून टाकेल, असं का वाटत राहतं?

पानगळीत शोषून घ्यावा सबंध जीवनरस एखाद्या झाडाचा, तसं शुष्क आणि म्लान वाटणारं सभोवताल. कधी नाही तर संगीतसुद्धा साथ देत नाही. सूरदेखील आणखी आणखी जखमी करत राहतात.... मला आत्ता असा अनुभव आलाय. आणि खरं तर त्याचं कारणही मला माहीत आहे. रोजच्या रोज ज्या बातम्या येऊन आदळताहेत, त्यामुळे असेल कदाचित; काश्मीरमधल्या प्रलयाच्या बातम्या, तिथली हानी, आटोकाट प्रयत्न करून तिथल्या लोकांना मदत करायला झटणारे लष्कराचे जवान... हे चित्र खूप थकवणारं आहे. आपण फक्त हळहळ व्यक्त करू शकतो. जिने प्रत्यक्ष परिस्थितीत काहीही फरक पडणार नाही, अशी वांझ सहानुभूती व्यक्त करू शकतो. या गोष्टीने स्वतःलाच नुसताच त्रास होत राहतो. गंमत अशी आहे की, यामुळे आपल्या रुटीनमध्ये काहीही फरक पडत नाही. रोजचे नित्याचे व्यवहार चालूच राहतात.

अधिक कदम नावाचा एक मित्र तिथे आहे माझा. त्याची-माझी काहीही ओळख नाहीये; पण तरीही तो मित्र आहे माझा. चमत्कारिक वाटेल हे ऐकायला कदाचित. हे त्याने वाचलं तर त्यालाही वाटेल. कारण रूढार्थाने आम्ही भेटलोच नाहीयोत कधी. मला तो भेटला दोन-तीन वर्षांपूर्वी एका अवाॅर्ड फंक्शनमध्ये. त्याच्या कार्याबद्दल त्याचा तिथे गौरव केला गेला होता. भारावून जाऊन एक चाहती म्हणून त्याला भेटले. मग त्याच्या अनेक मुलाखती मी पाहिल्या. त्याचं निःस्वार्थी बोलणं ऐकलं आणि मला तो मित्रच वाटायला लागला माझा. दहा-एक वर्षांपूर्वी पुण्यातला एक तरुण काश्मीर खो-यात जातो काय, तिथल्या परिस्थितीने हेलावून तिथेच काम करायचं ठरवतो काय... आज अधिकच्या ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ने किती मोठं काम उभारलंय तिथे. कित्येक आधार नसलेल्या मुलींना अधिकने घर मिळवून दिलंय. आज ‘भय्या’ आणि ‘बसेरा-ए-तबस्सुम’ त्या मुलींसाठी सारं काही आहे. मला आज यापूर्वी कधीही न भेटलेल्या त्या स्वप्नपंखी डोळ्यांच्या सगळ्या मुलींना भेटावंसं वाटतंय. अधिक करत असलेलं काम या प्रलयात वाहून जाणार नाही, ते दशांगुळे वर ताठ झळकत राहील, याची खात्री तर आहेच; पण पृथ्वीवरच्या स्वर्गावर सुल्तानीने कोपलेला खुदा आता अस्मानीतून त्यांना वाचवेल, त्यांच्यावर मेहेर करेल, अशी प्रार्थना मी सतत करतेय.

स्वतःला झोकून देऊन असं काही जगावेगळं काम जीवनाचं कर्तव्य म्हणून हाती घेण्याची ताकद माझ्या दुबळेपणाला सोसणारी नाही. कुठून येतो हा अदम्य उत्साह अधिकसारख्या लोकांमध्ये? कुठून मिळते त्यांना ही रसरसलेली प्रेरणा? कोणते ग्रह-तारे घडवत असतात त्यांचे मार्ग? मला खरंच माहीत नाही. पण त्या पहाडासारख्या दुर्दम्य इच्छाशक्तीने मला झपाटून टाकलंय. आतून मला आत्ता ‘तिथे’ असावंसं वाटतंय. माझ्या मित्रांनो, या संकटातून तुम्ही सुखरूप बाहेर पडाल. हे सावट निश्चितच विरून जाईल आणि काश्मीरचं ते अख्खं सोनेरी खोरं पुन्हा एकदा ‘बसेरा-ए-तबस्सुम’ (abode of smile) होऊन खदखदून हसू लागेल....इथे बसल्या बसल्या माझ्या बधिर मनातून, विचारशून्य वावटळीतून आलेली ही खरीखुरी दुआ आहे.

- स्पृहा जोशी

Sunday, October 11, 2015

किचनची सुपरस्टार !!

स्टार प्रवाह वर एक नवीन show घेऊन येतेय..
किचनची सुपरस्टार....बघा म्हणजे कळेल.
12 ऑक्टोबर पासून सोम - शुक्र 1 PM.
Promo..


Tuesday, October 6, 2015

वैद्य सरांचं जाणं..

माझ्या वैयक्तिक आयुष्यात बसलेला एक चटका म्हणजे, कविवर्य शंकर वैद्य गेले. मराठी भाषेची तपश्चर्याच केली त्यांनी आयुष्यभर. आणि त्यातून एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व तयार झालं होतं त्यांचं. शांतपणे बोलत बोलत सर त्यांचा मुद्दा पटवून द्यायचे. मृदूपणातला असा खंबीरपणा मी सरांइतका कुठेच पाहिला नाही कधीच ...

प्टेंबर महिन्यातल्या गेल्या पन्नास वर्षांतल्या सगळ्यात जास्ततापमानाच्या दिवशी बसून माझा लेख लिहिते आहे. सगळंच वातावरण तापलेलं. ३७ अंश!! समाजात एकुणातच तापलंय सगळं. अमेरिका भेटीतले मोदी, त्यांना पाहून काहींचं रक्त तापलंय, इकडे महाराष्ट्राच्या विधानसभेत ना महायुती न आघाडी, मधल्यामध्ये इंजिन तापलंय... दक्षिणेत जयललितांना अटक झाली, म्हणून काही आंधळे अनुयायी ताप ताप तापलेत. एकुणात काय, तर आसपास फक्त चटके, वाफा आणि कडकडीत उष्मा. अशी सगळी परिस्थिती आहे.

या उदास दिवसांमध्ये माझ्या वैयक्तिक आयुष्यात बसलेला एक चटका म्हणजे, कविवर्य शंकर वैद्य गेले. त्यांना अंतिम निरोप देताना मी तिथे नव्हते. या अशा प्रसंगी खंबीरपणे उभं राहायचं कसब नाही माझ्यापाशी. पळपुटेपणा आहे खरं तर एक प्रकारचा. चार दिवसांपूर्वी अरुण म्हात्रेंचा मेसेज आला... “सर वाट पाहत होते त्या दिवशी तुझी...” कितीतरी वेळ मी अरुण काकांचा मेसेज पाहत दगडासारखी होऊन गेले. गळ्याशी दुखायला लागलं. डोळे चुरचुरायला लागले. वैद्य सरांची एक एक आठवण उसळी मारून वर यायला लागली.

काय ऋणानुबंध असतात... रूढार्थाने मी सरांची विद्यार्थिनी नव्हते. त्यांचा माझा फार सहवास नव्हता. पण तरीसुद्धा माझे मित्र होते ते. दोस्त होते. मी अकरावीत असताना कॉलेजमधल्या एका कार्यक्रमात सरांना पहिल्यांदा भेटले. आणि मग या न त्या कारणाने भेटतच राहिले. हक्काने कधीही फोन करून मी त्यांना काहीही प्रश्न विचारायचे. त्यांच्याशी वाद घालायचे. पण शांतपणे बोलत बोलत सर त्यांचा मुद्दा पटवून द्यायचे. मृदूपणातला असा खंबीरपणा मी सरांइतका कुठेच पाहिला नाही कधीच. स्वतःच्या कविता खूप मजेशीरपणे ऐकवायचे सर. अगदी प्लेन, आवाजात काही चढउतार न आणता. ‘छत्री’ कविता सगळ्यात फेव्हरेट होती त्यांची. आणि “तुमची कविता मीच तुमच्यापेक्षा छान वाचते”, असं मी त्यांना चिडवलंयसुद्धा!

मिश्कील हसायचे फक्त! एक स्मितहास्य ठेवून टोमणे मारायचे, तेही शालजोडीतले. मराठी भाषेची तपश्चर्याच केली त्यांनी आयुष्यभर. आणि त्यातून एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व तयार झालं होतं त्यांचं. केवढा प्रचंड अभ्यास, किती प्रचंड अधिकार होता त्यांचा या बाबतीत. पण तरीही कातावलेले नव्हते, आयुष्याला कंटाळलेले नव्हते. आणि वयोमानानुसार लहान मुलं, तरुण यांच्याप्रति येणारा कडूपणाही आला नाही त्यांच्यात कधीच. अनेक प्रकांड पंडित लावतात तसला “आमच्या काळी असं होतं...” असा निराशेचा सूर मी ऐकलाच नाही त्यांच्याकडून कधी. उलट नव्या होतकरू मुलांचं कौतुक करण्यात सगळ्यात पुढे. स्वरात कधीही तिरस्कारयुक्त हेटाळणी नाही. उलट कायम हुरूप वाढवणारं प्रोत्साहन. पुढच्या अभ्यासाला नकळत, हलकेच दिशा देणारं. माझं ‘चांदणचुरा’ वाचून मला इतकं सुंदर पत्र लिहिलं होतं त्यांनी... कुठलंही काम बघून, सीरियल बघून सर आवर्जून फोन करायचे. ‘उंच माझा झोका’ तर फारच आवडीची! फोनवरसुद्धा ‘रमाबाई!!’ अशी हाक मारायचे... आणि मग खूप तऱ्हेतऱ्हेचं बोलायचो आम्ही. अगदी त्यांच्यातला कवी ओळखून त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शाळेतल्या मास्तरांपासून ते त्यांचं दैवत असलेल्या कुसुमाग्रजांपर्यंत. नव्या गाण्यांपासून नाटक- सिनेमापर्यंत. अगदी काहीही...

आम्ही शेवटचे भेटलो, ८ ऑगस्टला. ‘लोपामुद्रा’च्या प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी. त्यांना भेटायला गेले, आणि चरकले मी. त्यांची तब्येत इतकी बिघडल्याची कल्पनाच नव्हती मला. कौतुकाने मला आइस्क्रीम खाऊ घातलं. माझ्याबरोबर माझी मैत्रीण होती अश्विनी, तिला आमचा फोटो काढायला लावला. भरभरून आशीर्वाद दिला. पुस्तकाची पहिली प्रत मी त्यांच्या हातात ठेवली आणि मलाच भरून आलं. हे पुस्तक त्यांना अर्पण केलंय... अर्पणपत्रिका वाचून कोण खुश झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहताना मला सगळं मिळून गेलं... “आता परत कधी?” निघता निघता मी म्हटलं. सरांनी उत्तर दिलंच नाही. नेहमीचं मिश्कील हसत “सुखी राहा” इतकंच म्हणाले फक्त. “गुणगुणत राहायला पाहिजे. मनात सतत गाणं चालू पाहिजे. शब्द शोधत त्यांच्यामागे धावू नकोस. तेआपोआप तुझ्यापाशी येतील...” सरांचं हे शेवटचं सांगणं. माझ्या मनावर कायमची कोरली का काय म्हणतात न, तशी माझ्यासोबत आहेत. अगदी ठसठशीत. मी त्यांना खूप मिस करतेय. माझे दोन्ही आजोबा गेले, तेव्हा मी अगदी लहान होते. त्यांचं ‘जाणं’ मला आता तितकंसं जाणवत नाही. फारसं आठवतही नाही. पण लौकिकार्थाने माझ्या नात्यातल्या नसलेल्या पण माझ्या खूप जवळच्या असलेल्या या आजोबांचं जाणं मात्र सैरभैर करून गेलं.

वैद्य सरांनी मला कवितेतलं ‘टेक्स्चर’ शोधायला शिकवलं. त्या कवितेचा पोत ओळखायला लावला. स्पर्श, गंध, दृश्य प्रतिमांनी एखादी कविता आपल्याला कशी कवेत घेते, हे पाहायला शिकवलं. आज या रखरखीत उकाड्यात, खिन्न करून टाकणाऱ्या कोलाहलात त्यांची एक कविताच मला त्यातून बाहेर पडायला मदत करतेय. मला शांततेचा आवाज ऐकायला सांगतेय. दृश्य, नाद, रंग, स्पर्श, प्रतिमांच्या संवेदनांची माझ्यावर पखरण करतेय... गुदमरून टाकणाऱ्या गर्दीतून माझं निवांत एकटेपण जपायला लावतेय..!!!!

शांतता - शंकर वैद्य
घराचे पाठीमागले दार उघडले...
तेवढाच काय तो कडीचा आवाज
- बाकी शांतता...
- हिरवी शांतता...
- गार शांतता...
हिरव्यागार बागेत आलेले रेशमी सूर्यकिरण
फुले फुललेली...उमलती शांतता...मंद गंध
नव्हे... प...रि...म...ल
अलगद उडणारी फुलपाखरे
फांदीवर सरडा..सजग...स्तब्ध
पलीकडे उंच आभाळात देवीच्या देवळाचा कळस
त्याभोवती घारीचे भ्रमण
शांततेवर उमटलेला एक वलयाकार तरंग
सरसरत गेलेला पानांचा आवाज...साप
...नंतर कोसळती शांतता
पण मुंग्यांची संथ निमूट चाललेली रांग
...शांतता सजीव...गतिमान
अलगद अलगद तरंगत कुठून तरी आलेले
एक अलवार बाळपीस
वाऱ्याची मंद, नीरव झुळूक
दयाळ पक्ष्याची एक प्रश्नार्थक शीळ
...शांतता मधुरलेली
मऊ मातीवर उमटलेली माझी पावले...त्यांचे ठसे
जादूचे...गूढ
पुढे पुढे नेणाऱ्या पाऊलवाटेचे लाडीक वळण
पुढे गहन...गगन
शांततेत उभे माझे निवांत एकटेपण !

“आता परत कधी?” निघता निघता मी म्हटलं. सरांनी उत्तर दिलंच नाही. नेहमीचं मिश्कील हसत “सुखी राहा” इतकंच म्हणाले फक्त.
“गुणगुणत राहायला पाहिजे. मनात सतत गाणं चालू पाहिजे. शब्द शोधत त्यांच्यामागे धावू नकोस. ते आपोआप तुझ्यापाशी येतील..” सरांचं हे शेवटचं सांगणं.

- स्पृहा

Saturday, September 26, 2015

हेही नसे थोडके !!

अखेर... गेल्या बुधवारी मतदान पार पडलं. आपलं कर्तव्य उरकून मतदारराजा पाच वर्षांसाठी पुन्हा निद्रावस्थेत जायला मोकळा झाला. निवडणुकीच्या वातावरणात प्रचाराच्या नावावर एकमेकांवर केली जाणारी गरळफेक कमी झाली. भाषणातले मुद्दे ऐकून बुद्धिमत्तेची कीव यावी, अशी व्यासंगाची उधळण केली जात होती, रेडिओवर आचरट प्रचारगीतं न वाजता आता साधी नेहमीची गाणी वाजू लागली. गाड्या भरभरून राज्यभर चालणारी पैशांची ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ थांबली. त्यानंतर सगळ्यांनाच वेध लागले ते ‘नवा मुख्यमंत्री कोण होणार’ याचे... खरं तर सर्वसामान्य माणसाला याची पक्की खात्री असते, की कोणी का होईना; यामुळे आपल्या आयुष्यात काडीचाही फरक पडणार नाहीये. तसंच लळत-लोंबकळत लोकलचा प्रवास, मुलांच्या शाळा, डोनेशन्स, भाज्यांचे-जीवनावश्यक वस्तूंचे वाढते भाव, महिन्याच्या शेवटी कोलमडलेलं घरखर्चाचं अंदाजपत्रक, असुरक्षित आयुष्य, प्रत्येक पातळीवर कुरतडणारा भ्रष्टाचार, असुरक्षित आयुष्य, काही मिटून टाकलेली स्वप्नं आणि दडपून टाकलेल्या इच्छा...!! एवढ्या कलकलाटातून दिवस आला कधी, गेला कधी, कळतसुद्धा नाही. अशा एकुणातच जगण्याचीच हाय खाल्लेल्या परिस्थितीत आपण सगळे जगतो आहोत....पण अशा वातावरणातसुद्धा काही बातम्या किती छान झुळूक घेऊन येतात. गेल्या काही दिवसांतल्या भडक प्रचारकी गदारोळात आपण अंमळ दुर्लक्षच केलंय त्या बातमीकडे. भारताच्या कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानच्या मलाला युसूफझाई यांना शांततेचा नोबेल पुरस्कार घोषित झाला.
कोण आहेत हे कैलाश सत्यार्थी? म्हणून इंटरनेटवर शोध घेतला आणि त्यांच्या कार्याबद्दल वाचून थक्क व्हायला झालं. बालकामगारांच्या पुनर्वसनासाठी १९८० पासून हा माणूस अथक परिश्रम करतोय. हा प्रश्न सामान्य प्रश्न न राहता मानव कल्याण (human rights) अंतर्गत धसास लावला जावा, यासाठी झटतो आहे. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागू नये म्हणून नाना उपाय योजतो आहे. इतकंच नाही, तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर या विषयाची ज्योत तेवती ठेवतो आहे. वेळप्रसंगी स्वतः अंगावर हल्ले झेलून त्यांनी आतापर्यंत किती मुलांचं पुनर्वसन केलंय ठाऊक आहे?? तब्बल ७८,५०० हून अधिक! नतमस्तक व्हायचं आपण हे सगळं वाचून फक्त. आणि मलालाबद्दल तर काय बोलावं... माझ्या धाकट्या बहिणीच्या वयाची असेल ती फार फार तर. खरं तर तिच्याहूनही लहानच आहे ती. वयाच्या १७व्या वर्षी नोबेल पुरस्काराची सर्वात कमी वयाची मानकरी होण्याचा मान पटकावलाय तिने. एवढ्याशा आयुष्यात तिने जे काही करून ठेवलंय ते केवळ ‘अशक्य’, ‘दुर्दम्य’, ‘अचाट’ या विशेषणांमध्ये बांधून घालता नाही यायचं आपल्याला.
पाकिस्तानात राहून, सगळ्या जिवावरच्या आपत्तींना तोंड देऊन एक लहानगी मुलगी आपल्या आसपासच्या मुलींना आपल्या बरोबरीने शिक्षित करण्याचा चंग बांधते. स्वात खो-यात जेव्हा तालिबान्यांनी मुलींनी शाळेत जाता कामा नये, असा फतवा काढला, मुलींच्या शाळा जबरदस्तीने बंद करायला सुरुवात केली, त्या वेळेस या विकृत धर्मांध वादळात अनेक मोठाले वृक्ष कोलमडून गेले, त्यांनी शरणागती पत्करली; पण ‘मलाला’ नावाचं हे छोटंसं लव्हाळं मात्र आपल्या मुळांशी घट्ट राहून झगडत राहिलं. तालिबान्यांच्या गोळ्या झेलूनसुद्धा संघर्ष करत राहिलं. आदर आणि कौतुक यांखेरीज काय येणार मनात!! खरंच पात्रता नाही आपली आणखी काही बोलायची. मी विचार करत होते; काही जणांची आयुष्य अशी झळाळून निघतात, आणि काही जण रोजच्या अंधाराच्या गर्तेत चाचपडत राहतात, असं का? कैलाशजी आणि मलाला त्यांनी केलेल्या कामाच्या आनंदात त्यांची मनःशांती शोधत असतील कदाचित! काट्याकुट्यांचं असेल कदाचित, पण त्यांचं आयुष्य ख-या अर्थाने समाधानाचं आहे. आधुनिक युगातले संतच म्हटलं पाहिजे यांना. स्वतःवरचा आणि आपल्या कामावरचा संपूर्ण विश्वास किती सुंदर समतोल देत असतो यांना. आणि आपण? किती कोतं करून घेतो आपण आपलंच जगणं! 
परवा ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रिअल हीरो’ नावाचा नितांतसुंदर चित्रपट पाहताना हेच परत परत जाणवत होतं. डॉ. प्रकाश आणि साधनाताई, त्यांचं आयुष्य चहुबाजूंनी येऊन भिडतं आपल्याला. साधेपणातलं सौंदर्य आणि वास्तवाची भीषणता एकाच वेळेस अंगावर येते अक्षरशः! ‘प्रकाशवाटा’तले प्रसंग नाना आणि सोनालीताई जिवंत करतात, आणि आपले डोळे सतत एका अनामिक आनंदाने आणि अभिमानाने भरून येत राहतात...
ही डोळे भरून येण्याची संवेदनशीलता तरी आपल्यात शिल्लक आहे, हेही नसे थोडके..!! ही संवेदनशीलताच न जाणो, आपल्यालाही कधीतरी आपली जबाबदारी उचलायला शिकवेल, केवळ स्वतःकडे पाहायला शिकवणा-या मध्यमवर्गीय रडगाण्यातून बाहेर काढील, या महापुरुषांच्या महाकार्यात खारीचा वाटा उचलण्याचं बळ देईल! आणि कोण जाणे, अशा अनेक लहान लहान खारोटल्या एकत्र आल्या तर नव्या सुंदर समाजाकडे जाणारा एखादा भव्य सेतू उभा राहीलही... कोणी सांगावं!!!

स्पृहा

Thursday, September 24, 2015

म्‍हणे आम्‍ही सभ्य...

गेल्‍या काही दिवसांपासून एका विषयाने आपल्या आसपास थैमान घातलंय. AIB नॉकआउट अर्थात “ऑल इंडिया बक !!!!! सगळीकडे फक्त हीच चर्चा. काहींनी विषय टाळला. काहींनी झुरळ झटकल्यासारखा झटकून टाकला. काही संस्कृतिरक्षणाच्या ‘मोड’मध्ये गेले, तर काहींनी आपण किती ‘लिबरल’ आहोत, हे सांगत या प्रकाराचं समर्थन सुरू केलं. प्रत्येकाचे मुद्दे वेगळे, प्रत्येकाची म्हणणी वेगळी, प्रत्येकाची बाजू वेगळी.
आणि या सगळ्यापासून अनभिज्ञ असणाऱ्यांची एक वेगळी जमात आहे, ती तर आणखीनच वेगळी! या सगळ्यामध्ये घुसळून निघाले मीसुद्धा. मुळात कोण आहेत हे ‘AIB’? तर हा आहे एक यूट्यूब चॅनल. गुरसिमरन खंबा, तन्मय भट, रोहन जोशी, तन्मय शाक्य या विनोदवीरांनी मिळून काढलेला एक वाचाळ कॉमेडीचा धबधबा. आम्ही ‘टोकदार’ विनोद करतो, असं या मंडळींनी स्वतःच ठरवून टाकलेलं आहे. यांना कुठलाही विषय वर्ज्य नाही. राजकारणापासून सिनेमापर्यंत आणि महागाईपासून ते सगळ्याच गोष्टींमधलं यांना सगळ्यातलंच सगळंच कळतं. तसं कळायलाही काही हरकत नाही म्हणा...असतो काही जणांकडे हा गुण. आणि विनोदातून कोपरखळ्या मारणं हे तर किती अवघड काम... उत्तमोत्तम व्यंगचित्रकार, लेखक जेव्हा हे करतात तेव्हा बरं चालतं तुम्हाला! फारच ‘हिप्पोक्रॅट्स’ आहात बाबा तुम्ही!... तर या सगळ्यातलं सगळं कळणाऱ्या मंडळींचां हे चॅनल. त्यातल्या कर्कश विनोदांना ‘व्हायरल’ युगात ‘न भूतो..’ अशी लोकप्रियता मिळाली. अर्थकारणाने गती घेतली. लाखोंच्या घरात त्यांच्या व्हिडिओजना हिट्स मिळू लागले. च्युइंगम चघळत ‘इट्स सो कूल’ करणाऱ्या एका जमातीसाठी हा हॉट टॉपिक/ ट्रेंड झाला. उच्चभ्रूंसाठी, सेलिब्रिटीजसाठी ‘AIB’मध्ये उल्लेख होणं हा नवा मापदंड ठरला. आणि यातून जन्माला आला त्यांचा जाहीर कार्यक्रम, AIB नॉक आउट. ज्याने एक नवं वादळ उठवलं. श्लील-अश्लीलतेच्या सगळ्याच कल्पनांना मुळापासून हादरे दिले. सार्वजनिक ठिकाणी नेमकं कसं वागलं म्हणजे ते सभ्य किंवा योग्य, याची परिमाणंच बदलून टाकली.
अचकट–विचकट, बीभत्स बोलणं म्हणजे ‘इन’, ‘फॅशन’ अशी नवी परिभाषा जन्माला घातली. बरं, या शोमध्ये सहभागी होते करण जोहर, रणवीर सिंग, अर्जुन कपूर... आणि ‘शो’ला हजर असणारी मंडळी होती दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट इत्यादी अनेक... तरुणाईचे हे सगळे आयकॉन्स! आता आपले आदर्शच तिथे आहेत म्हटल्यावर तरुणांनी ते ‘फॉलो’ करावं, यात काहीच नवल नाही. किंबहुना ते अपेक्षितच आहे.

भीषण आहे हे सगळं चित्र. आणि त्यानंतर उठलेल्या प्रतिक्रिया आणखी भयंकर आहेत. जे काही त्या कार्यक्रमात बोललं गेलं, ते चारचौघात बसून ऐकण्याच्या लायकीचं नव्हतं. अत्यंत घाण, अश्लाघ्य, विनोदाचा कुठेही लवलेश नसलेले बीभत्स चाळे होते ते सगळे. कुठल्या तोंडाने करण जोहर त्याच्या पिक्चर्समधून ‘भारतीय संस्कृती की महानता’ लादतो आपल्यावर? मध्यंतरी दीपिका पदुकोणने एका इंग्रजी दैनिकावर तिच्या बाईपणाचा अपमान केल्यावरून रान उठवलं होतं. या कार्यक्रमात समस्त बाईजमातीवरच विकृत म्हणावी अशी टिप्पणी झाली, तेव्हा नाही वाटलं तिला हे बोलावंसं? कित्येक लोकांनी या ‘शो’चं समर्थन करताना म्हटलं, की अशा गोष्टी आपण सगळे बोलतोच, नॉनव्हेज जोक्स सर्रास व्हॉट्स अॅप ग्रुप्समधून फिरतातच... ताकाला जाऊन मग कशाला भांडं लपवायचं? मला हे सगळंच शिसारी आणणारं वाटतंय. अशा कित्येक गोष्टी आहेत हो, ज्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सगळेच करतो. पण बंद दाराआड! त्याची माहिती प्रत्येकालाच असते, पण ते संकेत असतात, म्हणून एक शहाणा समाज म्हणून आपण वाटचाल करतोय. नाही तर रस्त्यात कुत्री, आणि जंगलात माकडं सुखेनैव विहरतातच नं! आपण ‘माणूस’ असल्याचं कुठलंच लक्षण पाळायचं नसेल, तर मग काय प्रश्नच मिटला.

खरे भयावह आहे ते यामुळे घडणारे परिणाम! या शोवर बंदी घालण्याची मागणी झाली. व्हिडियो डिलीट करण्यात आला. पण सवंग असली तरी प्रसिद्धी ही प्रसिद्धीच असते! ती पुरेपूर झाली. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचंही काहींनी म्हटलं! दोन दिवसांपूर्वी यापुढे ‘सिनेमा-नाटकांमध्ये कोणते शब्द अश्लील म्हणून धरले जातील’ याची यादी प्रसिद्ध झाली! अर्थाअर्थी या दोन घटनांचा थेट संबंध नसेलही; पण आता खरंच माणसाचं जगणं मांडणाऱ्या संवेदनशील, तरल पण थेट भिडणाऱ्या कलाकृतींनी कोणाकडे दाद मागायची? AIBच्या शोवर बंदी घातली म्हणून गळे काढणारे ‘इंटलेक्चुअल्स’ या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाकडे सहानुभूतीने पाहतील? का पुरेसं ‘ग्लॅमर’ नाही म्हणून तिथेच सोडून देतील हा विषय? अतिरेकी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत अशी चुकवावी लागणार आहे यापुढच्या काळात? हे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असंच झालं!

आपल्याला बाबा AIBचे विनोद पचत नाहीत, हेच खरं! पु. ल., चिं. वि. जोशी, आर. के लक्ष्मण यांच्या निर्मळ विनोदाला चटावलेले आपण! ‘व्हायरल युगात’ खरं तर तसे मागासच म्हणायला हवेत. आचार्य अत्रे असते तर बाकी हा कार्यक्रम पाहून डोळे विस्फारून नक्की म्हणाले असते, “गेल्या दहा हज्जार वर्षांत ‘असा’ कार्यक्रम झाला नाही बुवा...!!!”

- स्पृहा